(प्रतिनिधी/सोमिनाथ घोरपडे)भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे पवारवाडी येथे संस्कार सचिव आयुष्यमान अमोल भोसले सर यांच्या वडिलांचे कालकथित बबन दामू भोसले यांच्या पुण्यानुमोदन विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी भंते भदंत काश्यप यांनी उपस्थितांसमोर प्रेरणादायी धम्मदेशना दिली. त्यांनी “कालकथित” या शब्दाचा सखोल अर्थ स्पष्ट करताना जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी विवेचन केले.मानवी जीवन क्षणिक आहे, म्हणूनच ते सदुपयोगी व्हावे. मृत्यू हा शेवट नसून धम्ममार्गाचा खरा आरंभ आहे. पुण्यानुमोदन म्हणजे केवळ स्मृती नसून, आपल्या प्रिय व्यक्तीच्या पुण्यकर्मांची आठवण ठेवून स्वतःचे जीवनही त्याच धम्ममूल्यांनी सुशोभित करणे होय.बौद्ध धम्माचे मूळ तत्त्व म्हणजे करुणा, प्रज्ञा आणि समता – यांचा अंगीकार केल्यासच खऱ्या अर्थाने मानवी जीवन यशस्वी व परिपूर्ण ठरते. त्यांनी साध्या, सोप्या आणि हृदयस्पर्शी शब्दांत सांगितलेल्या या धम्मदेशनेने सर्व उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले.
या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे बौद्धाचार्य म्हणून फलटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनी पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडले.हा कार्यक्रम केवळ पारंपरिक पुण्यानुमोदन न ठरता, तो बौद्ध धम्मातील जीवनदृष्टी आणि चिंतन यांचा प्रसार करणारा ठरला. भंते काश्यप यांच्या धम्मदेशनेतून उपस्थितांना – जीवनाच्या क्षणभंगुरतेचे भान, सद्विचार व सदाचार अंगीकारण्याची प्रेरणा, धम्ममार्गाने जगण्याचे महत्त्व, पुण्यकर्माची खरी व्याख्या
यांची जाणीव झाली.
मौजे पवारवाडी येथे संपन्न झालेला हा पुण्यानुमोदन कार्यक्रम हे केवळ धार्मिक कृत्य नव्हते, तर तो भंते काश्यप यांच्या प्रभावी धम्मदेशनेतून जीवनाचे सार आणि धम्ममार्गाचे महत्त्व प्रत्येक उपस्थिताच्या अंतःकरणात कोरले गेले.फलटण तालुक्याचे कोषाअध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे सर, आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे सर, कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते सर,संघटक आनंद जगताप उपस्थित होते.
Back to top button