ताज्या घडामोडी

धम्मनिष्ठ पुष्पावती सर्जेराव भालेराव यांचे निधन : भालेराव कुटुंबाचा आधारवड हरपला

फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील राजाळे येथील भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान तालुका अध्यक्ष, माजी श्रामणेर व बौद्धाचार्य आयु. महावीर सर्जेराव भालेराव यांच्या मातोश्री पुष्पावती सर्जेराव भालेराव यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भालेराव कुटुंबावर शोककळा पसरली असून पंचक्रोशीतील धम्मबंधूंमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पती सर्जेराव भालेराव यांच्या निधनानंतर पुष्पावती यांनी संपूर्ण कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळत मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना बौद्ध धम्म, संघ या त्रिरत्नांचा आदर्श घेऊन सामाजिक विचार आणि प्रगतिशील मूल्यांचा वारसा दिला. त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा कालखंड बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना वाहून घेतला. भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांताचा परिपाक म्हणूनच आज त्यांचे निधन 69 व्या अशोका विजयादशमीच्या म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी झाले.

त्यांच्या मुलांमध्ये चिरंजीव आयु. महावीर भालेराव हे भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान तालुका अध्यक्ष असून त्यांनी 2004 मध्ये श्रामणेर व बौद्धाचार्य म्हणून बौद्ध दीक्षा घेतली आहे. आज ते धम्मचळवळीचे कार्य अखंडपणे पुढे नेत आहेत.त्यांची पत्नी कल्पना महावीर भालेराव या राजाळे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या असून पंचायत समिती सदस्य म्हणून राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

मोठे चिरंजीव आयु. सतिश सर्जेराव भालेराव हे मुंबई येथे बीएसएनएल कंपनीत नोकरी करत असून लेखक, विचारवंत व समाज प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात.कन्या आक्का बारामती येथे स्थायिक असून वैवाहिक जीवन मंगलमय पद्धतीने व्यतीत करत आहेत.

संपूर्ण भालेराव परिवाराचे सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे. त्यामुळे पंचक्रोशीत या कुटुंबाला “आदर्श धम्मनिष्ठ कुटुंब” म्हणून मान्यता मिळाली आहे.
पुष्पावती भालेराव यांनी केवळ आपले कुटुंब उभे करण्यापुरतेच आयुष्य मर्यादित न ठेवता फुले-शाहू-आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या परंपरेशी स्वतःला जोडून घेतले होते. धम्मचळवळ हीच त्यांच्या आयुष्याची दिशा होती.

आज त्यांचे निधन म्हणजे भालेराव कुटुंबातील आधारवड कोसळणे आहे. त्यांच्या जाण्याने झालेली पोकळी अवर्णनीय आहे. मात्र भगवान बुद्धांच्या चार आर्य सत्याचा, आंबेडकरी विचारांचा आधार घेत भालेराव कुटुंब नक्कीच या दुःखातून सावरून धम्माचा प्रचार-प्रसार अधिक जोमाने पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पूज्य भंते काश्यप जी यांनी आदरांजली वाहताना तथागतांच्या वाणीतून निघालेल्या

अनिच्चा वत संखारा, उप्पादवयधम्मिनो ।
उप्पज्जित्वा निरुज्जंति, तेसं उपसमो सुखो ॥

म्हणजेच सर्व संखारी (संयोजनांनी बनलेल्या गोष्टी) अनित्य आहेत.त्यांचा उदय होतो आणि ते नष्ट होतात.त्यांच्या नाशानंतरचे शांत स्वरूप (निर्वाण) हेच खरे सुख आहे.ही गाथा बुद्धांनी स्वतःच्या अंतिम पारिनिर्वाणाच्या वेळी उच्चारली. मृत्यू म्हणजे अंत नसून, तो जीवनातील अनित्यत्वाची जाणीव करून देतो. या गाथेतून आपण हे शिकतो की मृत्यू नैसर्गिक आहे, त्यातून दुःख मानण्याऐवजी धम्माच्या साधनेत शांततेचा शोध घ्यावा.अशी भावना पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या निधना नंतर आदरांजली वाहताना व्यक्त केली आहे.

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा,जिल्हा शाखा, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, धम्म उपासक-उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय, राज्याचे संघटक तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, व मित्रपरिवार यांच्या वतीने पुष्पावती सर्जेराव भालेराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button